Sunday, October 11, 2015

ह्या अशांत संध्याकाळी
का हरवत जाते काही
ना जुने सोयरे होते
अन नवीन गवसत नाही.

दिवसाची तुटते नाळ
रात्रीस न धागा जुळतो
ह्या अगम्य अधांतरावर
जिव काहुरतो व्याकुळतो.

ज्या वाटांवरून येतो
अन दिशा आखतो भवती
उरती क्षितिजाचे भास
ह्या अथांग गर्तेपुढती.

मिटलेल्या फूलकळ्यांचे
पसरती दीर्घ उच्छ्वास
अंधार वेढूनि घेतो
उरलेसुरले अवकाश.

तुटलेल्या संध्याकाळी
क्षणभरात दृश्य बदलते
मी पुन्हा रोवते ‘असणे’
अन क्षणात बहरून येते.

हातात दीप घेताना
मन शुभंकरोती गाते
तुळशीच्या सांजदिव्याने
गाभारा उजळत जाते.

No comments:

Post a Comment