Sunday, October 11, 2015

मेघ दाटून येतात आणि अंधार होऊन जातो सारा.
सळसळ सळसळ करू लागते माझ्यामधली माझी छाया.
मुक्त विजेचे क्षितिजावरती तांडव चाले लखलखीतसे.
घुमडघुमड हे नभ सामोरे निमंत्रकाचे दूत जसे.

कोण पुकारे? भान हरपूनि, सरसर सरसर धावत जाते.
वर्षावाच्या धुंद सरींना अंगाखांद्यावरी झेलते.
पाण्याच्या थारोळ्या मधुनी थबडक थबडक कशी नाचते.
पाऊस म्हणजे जीवन सारे अशी हरवते अशी बहरते.

हात चिमुकले भिजले थिजले अन स्वप्नाची कोरी नाव.
अशी सोडते पाण्यामध्ये; जणु स्वप्नांना मिळतो गाव!
क्षणात पाणी अन चिखलाचा असा उडविते राळ कुणी.
विरून जाती लाटा स्वप्ने वर स्मरणांचा भार उरी.

तरी सदोदित जाण मनी तू स्वप्नच असते खरे निरंतर.
संपून जाते अनवट धुंदी स्वप्नाच्या पूर्तिनंतर.
किती डगमगो, वाहो, थांबो नकोस विसरू नाव सोडणे .
आणिक विसरायाचे नाही जलधारांनी चिंब नहाणे.

No comments:

Post a Comment