Sunday, July 16, 2017

घट्ट मुळे रोवून उभ्या असलेल्या एका झाडापासून
कल्पांतापर्यंत बांधलेली एक दोरी,
अगदी स्वप्नांच्या प्रदेशापर्यंत.
असा ताण की अजून थोडी आवळली
तर तुटून जाईल
आणि सैल सोडली तर
निसटून जाईल पकड.
दोन्ही आवश्यक -
जिवंर रहाण्यासाठी.
कल्पनेकडे निघताना
विसरून जायचं दोरीचं
वास्तवाशी मूळ,
पुन्हा परतताना करायची
स्वप्नरंजनाकडे पाठ.
चुकूनही ढळू द्यायचा नाही तोल
की झुकू द्यायचं नाही पारडं
कोणत्याच एका बाजूला.
रेंगाळायचही नाही कुठेच
कारण गती असेल तरच
साधला जाईल मेळ.
खरंतर डोंबार्याचं आयुष्य किती अवघड...
तो ताण, तो काच,
तो सांभाळावा लागणारा तोल
आणि पायांना होणारा जाच
तरी डोंबार्याचं आयुष्य किती सुंदर
त्या येरझार्या, तो अधांतर
ती गती, ती फिरती
आणि कुणाला न दिसणारी स्वतःची अशी मिती..

No comments:

Post a Comment